५०४) गोष्ट एका संपलेल्या नात्याची……
हि गोष्ट आहे ५५ वर्षे जुन्या नात्याची, जे १९ नोव्हेंबर २०१६ ला संपले, पण हे नाते स्मृतीत मात्र कायम असेल ह्याची मला खात्री आहे. माझे ६५ वर्षांचे आयुष्य आणि ५५ वर्षांचे हे नाते हातात हात घालून फुलले. आमच्या वयातील २० वर्षांचा फरक कालांतराने वाटेनासा / जाणवेनासा झाला. आमच्या नात्याचे हेच तर वैशिष्ठ होते. सुरवातीच्या काळात ह्या नात्याबद्दल जे जे समजले होते, त्याची प्रचिती ह्या दीर्घ काळात टिकली. काही नवीन गोष्टींची भर पडली, पण त्या गोष्टीही सकारात्मक होत्या.
कंमिटमेन्ट / दिलेला शब्द पाळणे ह्याचा खरा अर्थ ह्या नात्याने अधोरेखित केला. फार कमी लोकांना ह्याची कल्पना आहे. ह्या एकाच गुणामुळे सुरवातीच्या काळात मी त्यांचा भक्त झालो. त्या काळानुसार (१९६२) आयुष्य कसे जगावे ह्या संदर्भातील त्यांची तत्वे खूप उच्च होती, पण काळाच्या ओघात सर्व इतर गोष्टींबरोबर हि तत्वे सुद्धा मलिन झाली / नवीन पिढीने ह्या तत्वांना मूठमाती दिली. पण हा बदल ह्या नात्याने स्वीकारला नाही.
बदल हा आयुष्याचा अपरिहार्य असा भाग आहे. जे बदलते तेच आयुष्य असते. आयुष्य हे प्रवाही पाण्यासारखे असावे / ठेवावे लागते. नेमके हेच तत्व ह्या नात्याला पुरेसे उमगले नाही आणि त्यामुळे जीवनातील आनंदाला हे पारखे झाले, अशी जवळच्या लोकांची धारणा होती. परंतु त्यांच्या लेखी मात्र ह्याची अजिबात खंत नव्हती. हे नाते टेकनॉलॉजिपासून दूर का राहिले हे मला पडलेले कोडे आहे. कोणताही बदल स्वीकारण्यात शहाणपणा असतो हे काही ह्या नात्याला उमगले नाही.
माणसाची प्रगती हि अनेक वेळा तो माणूस कोठे पोचला ह्याचा विचार करून ठरविली जाते. परंतु माझ्या मते हे यशाचे शिखर नेमके कोठून सुरु झाले हे मात्र विचारात घेतले जात नाही. हि सुरवात जर विचारात घेतली तर ह्या नात्याने मिळविलेल्या यशाची खरी ओळख झाल्याशिवाय राहणार नाही.
जेव्हा हि सुरवात अतिशय प्रतिकूल वातावरणात सुरु होते, तेव्हा त्याचा ओरखडा त्या माणसाच्या मनावर उमटल्या शिवाय राहत नाही. जन्म आपल्या हातात नसतो पण जगावे कसे हे मात्र आपल्या हातात असते. अर्थात हे जगण्याचे सिद्धांत त्या माणसासाठी बरोबर असले, तरी जवळच्या मंडळींना ते पटतात असे नाही. नेमके असेच काहीसे ह्या नात्याबद्दल घडले. अश्या परिस्थितीत माणूस बरेच वेळा आक्रमक आणि हट्टी होतो. आपल्या कर्तृत्वाने आपले दोष झाकून समाजमनाला भिडतो. परंतु असे काही झाले नाही. यश मिळवूनसुद्धा आपला कष्टदायक भूतकाळ हे नाते विसरू शकले नाही.
संवाद ह्या कोणत्याही नात्याचा प्राण असतो. कमी संवादामुळे ह्या नात्याची खरी ओळख इतरांना होऊ शकली नाही. जी मंडळी त्यांना खऱ्या अर्थाने ओळखत होती, त्यांच्या बाबतीत कमी संवादाचा प्रश्न गौण होता.
जे आरश्यात दिसते ते खरे सौन्दर्य नसते. Beauty is not what you see in the mirror. खरे सौन्दर्य म्हणजे तुमचे अंगभूत गुण. गुणग्राहक माणसाला हे गुण नक्की कळतात. त्यामुळेच ह्या नात्याला ऑफिस मध्ये प्रचंड मान होता. हल्लींच्या जमान्यात हे गुण जगाला ठणकावून सांगावे लागतात, हे दुर्दैव आहे.
त्यांचे वागणे / त्यांच्या भावना कृतीतून ओळखाव्या लागत. समोरच्या माणसाच्या यशाचा आनंद त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या डोळ्यात जास्त दिसे. त्यांनी माणसे जोडली. गरजवंताला होईल तेव्हडी मदत केली, पण फार कमी लोकांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवली.
वैयक्तिक आयुष्यात त्यांनी काही दु:खे पचवली. आयुष्यातील दु:खे हा पूर्वसुकृताचा भाग असतो.
आयुष्यभर मानसिक आणि शारीरिक दगदग ह्या नात्याने केली. काम हा त्यांचा प्राणवायू होता. ह्या कामात त्यांनी टेकनॉलॉजिचा उपयोग केला असता तर त्यांचेच श्रम वाचले असते. असो.
असे हे आमचे ५५ वर्षांचे नाते अचानक संपले, ह्याचे खूप वाईट वाटले. त्याच दिवशी सकाळी मी ह्या नात्याला भेटायला गेलो होतो. पण हे नाते मान फिरवून दूर जाण्याच्या तयारीत गुंतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला. त्यांनी शिकविलेला प्रोटोकॉलचा धडा मी गिरविला एव्हडीच माझ्या त्या दिवसाच्या भेटीची फलश्रुती होती.
मनातील भावना शब्दबद्ध केल्यानंतर आता जरा बरे वाटते आहे.
सुधीर वैद्य
२२-११-२०१६